चिकाटी
आम्हाला सवय फक्त लॉक, लॉकअप, लॉकर आणि लिपलॉक एवढ्याची,
एवढीच काय ती मजल होती आमच्या इवल्या मेंदूची.
लिपलॉक हा लोकलज्जेस्तव कधी उच्चारला सुद्धा नाही.
लॉकर वगैरे असायला तशी ऐपत नव्हती
कधी त्याचा संबंध आला नाही.
नाही म्हणायला, इन्शुरन्स वाल्यांनी 'लॉकइन' रुजवला आहे खरा.
पण हिंदी सिनेमाने मात्र प्रामाणिकपणे 'लिपलॉक' हा
हिन्दी शब्द(?) लहानपणापासून शिकवला आहे.
त्यात आता हे 'लॉकडाऊन'!
अन सगळंच झालंय अपसाईड डाऊन!!
कुणाचं शेअर मार्केट डाऊन,
कुणाचं टीआरपी डाऊन,
कुणाचं इनकम डाऊन,
कुणाचं डाऊन राजकारण,
कुणाचं डाऊन आचरण
कुठं रेड अलर्ट तर कुठं बॉटमस् रेड!
हॉस्पिटल्सनी सज्ज ठेवले असंख्य बेड.
सरकार सगळे उपाय करायला कंबर कसून तयार,
विरोधकांनी त्याचं ही करावं हत्यार.
एकशे तीस कोटींचा देश,
त्यातही अव्यवस्था, अज्ञान, अशिक्षितपणा, बेकारी, दहशतवाद, श्रद्धाळू अंधश्रद्धा आणि डोळस अंधश्रद्धा
किती किती म्हणून अडचणी?
पण भारतीय बाण्याचा एक गुण विशेष :
*चिकाटी*
कुठल्याही समस्येवर मात करण्याची त्यांची जुगाडू हातोटी!
असो,
कुणी मेनू बनवले,
कुणी खेळ खेळले (इंडोर)
कुणी एकमेकांना घरबसल्या आव्हानं दिली: पक्वान्नाची किंवा साड्या नेसण्याची!
कुणी सेलफ्यांचा पाऊस पाडला,
कुणी वेबसिरीजचा.
सामाजिक संस्था पुढे सरसावल्या,
ठिकठिकाणी अन्नछत्रे आणि निवारा छावण्या उभारल्या.
कुणी पोळ्या वाटल्या तर कुणी भाजल्या.
असंघटित श्रमिकांनी तर शहरातल्या उड्डाणपुलांखाली सुद्धा अनेक रात्री काढल्या!
उद्योजकांनी अन धनिकांनी(त्यात सगळेच आले कारागिरपसून कलाकारांपर्यंत) सढळहस्ते दान केले.
पोलीस, डॉक्टर, सफाईकर्मचरी,
या भूदेवांचे लोकांनी गल्लोगल्ली पुष्पवर्षावाने स्वागत केले.
यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बळीराजाचं आपल्या खऱ्या अन्नदात्याचं महत्व सगळ्यांना कळलं.
ज्या काळात इतर देशांच्या व्यवस्थानी धीर सोडला,
त्याच काळात भारतीयांनी घरात राहून धीर धरला.
चिकटीच ही....
हे ही दिवस जातील, पुनः सगळं थाऱ्यावर येईल.
भारत जगाला जगण्याचा जगवण्याचा आदर्श देईल.
होय तेवढी चिकाटी आहे भरतीयांकडे अजून.
लक्षुमण मूर्च्छित पडल्यावर रात्रितच औषध व्हावे म्हणून सुर्यालाही झाकून टाकण्याची जिद्द ठेवणारा राम आहे म्हणून,
म्हणून हा देश अजूनही डगमगलेला नाही....
कारण फक्त एकच ...चिकाटी!
....अभिनव अक्षर
Comments